सातारा, दि. 30 – करोना आणि लॉकडाऊन, अनलॉक, ब्रेक द चेन आदी उपाययोजनांमधून आज सामान्य व्यक्ती, कुटुंबे आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळेच भारतातील गरीबातील गरीब जगला पाहिजे, या धोरणामधून मे आणि जून या दोन महिन्यांकरीता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
या योजनेतून जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोफत अन्नधान्य पुरवठा विनासायास गरीबांपर्यंत पोचवण्याकरीता प्रशासनाच्या बरोबरीने प्रसंगी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेऊन सर्व प्रयत्न केले जातील, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
आजच्या खडतर काळात माणुसकीची बांधिलकी जपली पाहिजे, असे नमूद करुन उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात पुढे नमूद केले आहे की, आज भारत देश स्वयंपूर्णतेकडे जात असताना, करोना संकटात सापडला आहे. या संकटावर मात करत असताना संपूर्ण जगात करोनावर लस उत्पादन करणारा भारत महत्वपूर्ण देश ठरला आहे.
अशा परिस्थितीत करोना लसीकरण शक्य तितक्या लवकर करणे आणि दुसऱ्या बाजूला करोनाग्रस्तांवर प्रभावी आणि सक्षम उपचार करणे अशी दुहेरी जबाबदारी प्रशासनावर पडत आहे. करोना काळात हातावरचे पोट असणाऱ्या अनेक कुटुंबाची उपासमार होऊ नये, म्हणून अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने पुढे आल्या असल्या तरी कोणताही गरीब अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र सरकारने दोन महिन्यांकरीता सुमारे 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करुन प्रत्येक कुटुंबाला गहु, तांदूळ मोफत पुरवण्याचे धोरण आखले आहे. या योजनेमधून 80 कोटी व्यक्तींना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मोफत धान्य वाटपाबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोललो आहोत.
तसेच या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करुन कृती आराखडा तयार करावा, तयार केला असल्यास तो जाहीर करावा अशा सूचना त्यांना दिल्या. याकामी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या वितरण व्यवस्थेची माहिती घेऊन प्रसंगी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.