पुणे – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल ते जून, 2020 या कालावधासाठी मंजूर असलेल्या नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमाह 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
सर्वप्रथम दि. 1 एप्रिलपासून महिन्याचे नियमित 3 किलो गहू व दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती 2 रु. प्रति किलो दराने गहू आणि 3 रु. प्रति किलो दराने तांदूळ, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटाला तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 35 किलो धान्य प्रति शिधापत्रिका 2 रु. प्रति किलो दराने गहू व 3 रुप्रति किलो दराने तांदूळ वितरीत करण्यात येत असून आतापर्यंत 83.35 टक्के शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दि. 8 एप्रिलपासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजना लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रति माणसी 5 किलो मोफत तांदूळ माहे एप्रिल 2020 मध्ये वाटप सुरू करण्यात आले आहे. व तशीच कार्यवाही माहे मे व जून, 2020 मध्ये अंवलबण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
अन्नधान्यापासून एकही शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानासमोर गर्दी करू नये. शिधावाटप दुकाने सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत उघडी ठेवण्याकरिता आदेश दिले आहेत. शिधापत्रिकाधारकांनी स्वत:हून त्यांचे धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून प्राप्त करून घ्यावे.
– अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी.