राजगुरूनगर, (रामचंद्र सोनवणे) : राजगुरनगर शहरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोणीही गरीब गरजू उपाशी राहू नये म्हणून येथील हुतात्मा राजगुर सोशल फाउंडेशन,जैन श्रावक संघाच्या माध्यमातून राजगुरूनगर एसटी बस स्थानकात तब्बल २०० नागरिकांना मोफत जेवणाची सोय आजपासून (दि.१०) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
करोना विषाणूवर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्वजण घरात आहेत. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्यांची संख्या राजगुरूनगर शहरात मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना याकाळात जेवणासाठी साहित्य घेणे मुश्किल बनले आहे त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीचे संकट आले आहे. असे असताना शहरातील काही संस्था, सांगताना नागरिक यांनी पुढाकार घेत दानशूर वृत्तीने जमेल ती मदत दिली जात आहे. शहरातील गरीब गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांना जेवणाची व अन्न धान्य देण्यासाठी हजारो हात सरसावले आहेत.
राजगुरूनगर शहरात सुरुवातीपासून बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम सुरु करून दररोज २०० पेक्षा जास्त नागरिकांना जेवणाची घरपोच सुविधा उपलब्ध दिली आहे. त्यानंतर शिवभोजन थाळी शहरात सुरु झाली त्यातून १०० लोकांना एकवेळचे जेवण दिले जात आहे. आणि आज (दि. १०)पासून हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, जैन श्रावक संघाच्या माध्यमातून २०० नागरिकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. चाकण परिसरातील कामगारांना अनेकांच्या माध्यमातून सुमारे तीन हजार नागरिकांना जेवण दिले जात आहे तर ३० हजाराच्या वर किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन व जैन श्रावक संघाच्या वतीने आज येथील एसटी बस आगाराच्या आवारात (एसटीस्टॅन्ड) वर २०० जनांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली त्यासाठी नाके गरीब गरजू कुटुंबांनी सोशल डिस्टंस ठेवत रांगेत उभे राहून हे जेवण घेतले. फाउंडेशन व जैन श्रावक संघाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे.