पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दोन सीएनसी बस मिळाल्या. त्याद्वारे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशाद्वारापासून मुख्य इमारतीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, त्याचे योग्य पद्धतीने नियोजन होत नसल्याचे या मोफत बससेवेचा हेतू साध्य होत नसल्याचा मुद्दा अधिसभेत उपस्थित करण्यात आला. त्यावर विद्यापीठाने ठोस नियोजन करावे, अशी मागणी सदस्यांनी केली.
यापूर्वी विद्यापीठाला मोफत सायकल्स देण्यात आल्या होत्या. या सायकल मोफत असल्याने त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नव्हता. परिणामी, हा प्रयोग फसला. त्यानंतर आता “एमएनजीएल’तर्फे विद्यापीठाला दोन सीएनजी बस देण्यात आल्या. या दोन्ही बस विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून पर्यावरण विभाग, जयकर ग्रंथालय, मुख्य इमारत, परीक्षा विभाग, कुलसचिव कार्यालय, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह असे थांबे केले होते.
मोफत बससेवा असतानाही त्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही. तर, त्याचे वेळेचे कोणतेच नियोजन पाहावयास मिळत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना व नागरिकांना रिक्षा अथवा पायी विद्यापीठात जावे लागत आहे. याउलट बस मात्र विद्यापीठाच्या आवारात एकाच ठिकाणी स्थिर उभी असल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ बससेवेचे योग्य पद्धतीने वापर होत नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात अधिसभेत प्रसेनजीत फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केला. चांगल्या बस व मोफत असूनही, त्याची योग्य पद्धतीने वापर होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याप्रकारात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच बससेवा सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.