उदयनराजे भोसले : कुडाळला राष्ट्रवादीचा संवाद मेळावा
कुडाळ – गेल्या पाच वर्षांत जनतेला निधी कमी व आश्वासनेच जास्त मिळाली. विकासाची भाषा करणाऱ्यांनी जनतेची घोर फसवणूक करून फक्त स्वत:चाच विकास साधला असल्याचा आरोप सातारा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला.
लोकसभेच्या प्रचारादरम्यान जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कुडाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, मी किंवा आमचे बंधू आ. शिवेंद्रराजे दोघेही राजघराण्यातील असलो तरी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मते मागितली नाहीत. ना त्याचे राजकीय भांडवल कधी केले. मात्र काहीजण माथाडी कामगारांच्या नावावर स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करित आहेत. माथाडी कामगारांविषयी कळवळा दाखवून मतांसाठी भावनिक आवाहन करत आहेत.
मात्र जावळीतील माथाडी सुज्ञ असून ते कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत तर योग्य ती भुमिका घेऊन ते मतपेटीद्वारे विरोधकांना त्यांची जागा दाखवतील. आगामी काळात तालुक्याचा म्ुख्य प्रश्न महू हातगेघर धरणासाठी मी व आ. शिवेंद्रराजे दोघेही जिवाचे रान करून प्रश्न निकालात काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी, पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमास माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, माजी सभापती अरूणा शिर्के, बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा समिंद्रा जाधव, जितेंद्र शिंदे, डॉ. सुरेश शेडगे, तानाजी शिर्के, हिंदुराव तरडे, दादा फरांदे, जयदीप शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.