पालकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष : स्कूलबॅगमध्ये वह्या पुस्तकांऐवजी हत्यार
– रामकुमार आगरवाल
देहुरोड – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कुख्यात टोळ्या सध्या थंडावलेल्या असल्या तरी शाळकरी मुलांमधील भाईगिरी सुसाट सुटली आहे. देहुरोड परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका शाळकरी मुलाच्या दप्तरामध्ये कोयता आढळल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या या कोवळ्या गुंडांवर अंकुश ठेवणे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याशिवाय नामावंत शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता आणि नावलौकीकास ठेच पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देहुरोड परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीच्या शाळेतील स्कूल बॅगमध्ये वह्या-पुस्तकांऐवजी दप्तरात कोयता आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पालकांचे विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. देहुरोड परिसरात सर्वधर्मीय नागरिक वास्तव्यास असल्याने देहुरोडला “मिनी इंडिया’ संबोधले जाते. या परिसरामध्ये उच्चभ्रूसह अनेक झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू अशा विविध माध्यमांच्या शासकीय व निमशासकीय शैक्षणिक संस्था आहेत.
“भाई’ बनण्याची “क्रेझ’ तसेच विद्यार्थ्यांवरील आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी “मुळशी पॅटर्न’प्रमाणे नववीतील विद्यार्थ्यांने शाळेच्या वह्या-पुस्तकांऐवजी दप्तरात चक्क कोयता आल्याचा धक्कादायक प्रकार एका शाळेत नुकताच उघडकीस आला. वर्गातील संबंधित शिक्षकांने विद्यार्थ्यांची विचारपूस केल्यानंतर उद्धट भाषा आणि उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये “भाई’ बनण्याचा “क्रेझ’ दिसून आला. संबंधित शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांना देहुरोड पोलीस ठाण्यात हजर केले.
मात्र पालकांची विनवणी आणि विद्यार्थ्याचा भविष्याचा विचार करतात पोलिसांनीही कारवाई करताना हात आखडता घेतला.
शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे समुपदेशन, विविध व्याख्याते, मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन करण्यात येत असते. मात्र सराईत गुन्हेगारांकडून तसेच गुंडांकडून होत असलेल्या अल्पवयीन मुलांचा वापराने अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे ओढले जात असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
काही अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये “भाई’ बनण्याची घाई झाल्याचे दिसून येत आहे. “कानुन के हाथ लंबे होते है’ याप्रमाणे पोलिसांकडून भाईची भाईगिरी संपवत त्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपाने त्याला न्यायालय शिक्षा देते, तर अनेक गुन्ह्याने तडीपार, मोक्का ही होऊन भविष्य अंधाराकडे गेले आहेत. असाच प्रकार शाळेत कोयता आणून विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचा सूर पालक वर्गातून अळविला जात आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून अनेक पालक प्रतिकूल परिस्थितीतही मुलांना चांगले शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा ठेवतात.
मुलांचे आई-वडील हे आपल्या परिस्थितीनुसार विविध शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवत असतात. आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर ते नक्की शाळेत जातात का ? हे पाहण्याबरोबरच घरी आल्यानंतर दिवसभरात शाळेत काय घडले, याबाबत पालकांनी मुलांशी संवाद ठेवला पाहिजे. अधून-मधून त्यांच्या वह्या पुस्तकांवर दप्तराची तपासणी पालकांनी केली पाहिजे. घराबाहेर असताना आपला पाल्य नक्की कोणाच्या संगतीत असतो. यावरही पालकांनी लक्ष ठेवून सजग राहिले पाहिजे, तरच शिक्षणाचा व विद्यार्थ्यांचे भवितव्य घडण्यास मदत होईल.
अरेच्चा, अट्टल गुन्हेगारच “आयडॉल’
वाढत्या गुन्हेगारीला नानाविध कारणे आहेत. विशेष म्हणजे शालेय जीवनात असतानाच भाईगिरीची लागण होते. हल्ली मुलगा आपला आदर्श हा वडील-पालक किंवा स्वातंत्र्यसेनानी ठेवत नाहीत, तर एखाद्या टोळीचा अथवा अट्टल गुन्हेगार ठेवतो. मग प्रश्न असा उपस्थित होतो की खरंच तुमचे पालक तुम्हाला टोळीचा म्होरक्या होण्यासाठी शाळेत, अथवा महाविद्यालयामध्ये पाठवतात का? कुटुंबातील एखाद्या सदस्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्या टोळीचा म्होरक्याचा वाढदिवस आणि त्याचा बॅनरबाजी केली जात आहे.
“धूम स्टाइल’ थांबली पाहिजे…
देहुरोड परिसरातील “याच’ शाळेत शिकणारे अल्पवयीन विद्यार्थी चक्क शाळेच्या आवारात फेविकॉल, एसआर, सुलोचन, टेक्सोबॅन्डचा वापर करुन नशा करीत करीत असल्याची चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी एक विद्यार्थी बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. सध्या अनेक अल्पवयीन विद्यार्थी शाळेत चक्क दुचाकीवर येतात. येता-जाता ट्रीपल सीट भरधाव वेगात “धूम स्टाइल’ने दुचाकी चालवत मस्ती करत असतात. याकडे ही लक्ष देणे गरजेचे झाले असून, कायदेशीर कारवाई करणेही गरजेचे बनले आहे.