वनस्पती केवळ दुसऱ्यांसाठी जगत असतात आणि आपली फळं, फुलं एवढंच काय पण पानं, खोडं, मुळं, साली हे सगळे भाग इतर प्राण्यांसाठी दान करीत असतात. खरोखर वनस्पती नसत्या तर प्राणिमात्रांचं जीवन अशक्य झालं असतं.
एक संस्कृत सुभाषित सांगतं :
छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे ।
फलान्यापि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः इव ।।
म्हणजे झाडं स्वत: तळपत्या उन्हात उभी राहून इतरांना थंडगार सावली प्रदान करतात. फळंदेखील दुसऱ्यांसाठी देणारे वृक्ष म्हणजे सत्पुरुषांप्रमाणेच आहेत.
अशा परोपकारी वनस्पतींसाठी आपण काय करतो? तर इमारती, रस्ते बांधण्याकरता त्यांची कत्तल करतो. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फक्त फांद्या तोडण्याची आज्ञा असताना संपूर्ण वृक्षाची हत्या केली जाते. नवीन वसाहत किंवा विमानतळ उभे करण्यासाठी जंगलंच्या जंगलं उद्ध्वस्त करण्याचं दुष्कृत्य घडतं. माणूस उपकारांची परतफेड अशी अपकारानं करतो.
पंचतंत्रामध्ये तर चक्क यज्ञावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे :
वृक्षान्छित्वा पशून्हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम् ।
यद्येवं गम्यते स्वर्गं नरकं केन गम्यते ।। पंचतंत्र 3.107
पंचतंत्रकार विष्णुशर्मा म्हणतात की, झाडं कापून आणि पशुबळी देऊन रक्ताचा चिखल निर्माण केल्यानं (यज्ञातील विधींना उद्देशून) जर स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग नरक कोणत्या मार्गानं प्राप्त होतो?
प्रतिकारक्षमता शून्य असलेल्या वनस्पतींचा नाश- तोही स्वार्थासाठी- करणं कितपत नैतिक आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोकसंख्येमध्ये अमाप वाढ होत असताना आणि लागवडीखालील जमीन कमी कमी होत असताना व्यावहारिक दृष्ट्यादेखील वनस्पतींचं हनन योग्य नाही. तापमानवृद्धीला आणि पर्यावरणनाशाला वनसंवर्धन हाच एक उपाय आहे. परंतु हे मनुष्यजातीच्या कृतीत येणं हे महत्त्वाचं आहे.
विचार केल्यावर असं लक्षात आलं की आपण वनस्पती नष्ट करीत नसलो तरी त्यांची व्यवस्थित काळजीही घेत नाही. रोपांना कीड लागली की पुढचा मागचा विचार न करता आपण कीटकनाशकाची फवारणी करतो. झाडांना आवश्यक आहे की नाही याचा विचार न करता पाणी घालत सुटतो. झाड कोमेजू लागलं- वठू लागलं की आपल्याला काय करावं हे सुचत नाही. अगदी वनस्पतीतज्ज्ञदेखील सरसकट सल्ले देतात.परिणामी ते उपयुक्त ठरतातच असं नाही.
आणखी एक गोष्ट अशी की एखादी व्यक्ती आजारी पडली की तिची डॉक्टर व्यवस्थित तपासणी करतात, आवश्यक असल्यास अधिक तपासण्या प्रयोगशाळांतून करवून घेतात आणि त्या व्यक्तीची वैयक्तिक काळजी घेऊन उपचार केले जातात. अशी पद्धत प्राण्यांच्या बाबतीत थोड्याफार फरकानं अनुसरली जाते परंतु वनस्पतींच्या बाबतीत अशी पद्धत वापरली जात नाही. ज्या वनस्पतींकडून आपण जीवनावश्यक असं सर्व काही घेतो त्यांच्या बाबतीत आपण किती कृतघ्न आहोत?
काही जण म्हणतील की पिकाला रोग झाल्याचं दिसलं की अनेक तज्ज्ञ धावपळ करतात आणि उपाययोजना करतात. पण ते उपाय म्हणजे औषधांची फवारणी यापलीकडे फारसे जात नाहीत. त्यानंही काही फरक पडला नाही तर चक्क सगळं पीक जाळून टाकतात. आपण असं माणसांच्या बाबतीत करतो का?
मला अपेक्षित आहे ते म्हणजे प्रत्येक नाही तरी नमुन्यादाखल अनेक रोपांची तपशीलवार तपासणी आणि त्यावर आधारलेली उपाययोजना. यासाठी हवेत वनस्पतींचे डॉक्टर- खरेखुरे वनस्पतींचे डॉक्टर! वनस्पतींसाठी रुग्णालयं स्थापणं अशक्य आहे परंतु प्रत्येक झाडाचं, वठलेल्या वृक्षाचं, बागेतील रोपाचं आणि शेतातील पिकाचं आरोग्य जपण्यासाठी फक्त वनस्पतींना समर्पित अशी आरोग्यशाळा आणि वनस्पतींचे धन्वंतरी हे निर्माण करणं अतिशय आवश्यक आहे.
वनस्पतींवरची कीड, त्यांना बाधित करणारे विषाणू यावर अनेक प्रयोगशाळांमध्ये संशोधन चालू आहे हे मला माहीत आहे. पण हे मार्ग वनस्पतीकेंद्रित नाहीत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर विषाणूंना मारक अशी लस आणि औषधं निर्माण केली गेली. प्रत्येक व्यक्तीचं वैशिष्ट्य, तिचं वय अशा अनेक बाबी लक्षात घेऊन मग योग्य मात्रेत लसीकरण झालं. अशा पद्धतीनं जेव्हा वनस्पतींच्या अनारोग्याचं निदान आणि चिकित्सा होऊन उपाययोजना होईल तो सुदिन. तेव्हा हवेत खरेखुरे वनस्पतींचे डॉक्टर!
श्रीनिवास शारंगपाणी