साउद्म्प्टन (लंडन) – इंग्लंडमधील बेभरवशाच्या वातावरणाचा पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीला फटका बसला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ही लढत सुरु आहे.
पाचव्या दिवसीसुद्धा पावसाची शक्यताअसल्याने सामना अनिर्णीत राहण्याचीच चिन्हे दिसत आहेत, त्यामुळे पहिल्या जागतिक कसोटीत संयुक्त विजेता मिळणार असेच चित्र निर्माण झाले आहे.
पाच दिवसाच्या सामन्यातील पहिला आणि आजचा चौथा दिवस एकही चेंडू टाकला गेला नाही. खेळ सुरु होण्याची शक्यता कमी वाटल्यावर सुरवातीच्या नियोजित वेळेनंतर चार तासांनी पंचांनी दिवसभराच्या खेळावर पाणी पडल्याचे जाहीर केले.
पावसामुळे खेळ होऊ शकत नाही, असे आयसीसीने नंतर जाहीर केले.आता पर्यंत केवळ १९६ षटके टाकली गेली आहेत. भारताचा डान २१७ धावांत संपुष्टात आल्यावर न्यूझीलंडने पहिल्या डावात २ बाद १०१ धावा केल्या होत्या.
१९६ षटकांचा खेळ बाकी
उर्वरित दोन दिवसांत प्रत्येकी ९८ षटकांप्रमाणे कमाल १९६ षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकांत कसोटी निकाली न ठरल्यास भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद देण्यात येणार आहे.
पहिला दिवस : पावसामुळे वाया
दुसरा दिवस : ६४.४ षटके
तिसरा दिवस : ७६.३ षटके
चौथा दिवस : पावसामुळे वाया
असे महत्वाचे सामने इंग्लंडला घेतातच का ? कळत नाही. हे सांगताना एक इंग्लंडवासिय म्हणून दुःख होत असले, तरी ते खरे आहे.
-केविन पीटरसन
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना निराशेनेच स्टेडियम सोडावे लागले. सामन्याचा उद्या पाचवा आणि अखेरचा दिवस आहे. त्यानंतर आयसीसीने राखीव दिवसाचा उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, यानंतरही आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज असल्यामुळे सामन्याचा निर्णय लागणे खूप कठीण आहे.