वाई – दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांच्या 15 जागांसाठी 59 अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी चार जणांनी मंगळवारी माघार घेतली. त्यामुळे आता 55 अर्ज शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया दि. 22 मेपासून सुरू झाली आहे.
संचालक मंडळातील 15 जागांमध्ये सर्वसाधारण गट दहा, महिला राखीव दोन, अनुसूचित जातीजमाती प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग. इतर मागास प्रवर्ग प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या निवडणुकीत सर्वसाधारण गटामध्ये 39, इतर मागास प्रवर्गात चार, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात आणि महिला राखीवमध्ये पाच उमेदवारी अर्ज बाकी राहिले आहेत.
दरम्यान, सर्वसाधारण गटातून सचिन अमृतलाल गांधी आणि संदीप सदाशिव खामकर यांनी, तर इतर मागास प्रवर्गातून प्रीतम किशोर भूतकर आणि अतुल हणमंत वाईकर यांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार, दि. 13 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दि. 14 जून रोजी चिन्ह वाटप होणार आहे. आवश्यकता वाटल्यास रविवार, दि. 25 रोजी मतदान घेण्यात येणार असून, दि. 27 रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत, असे जनार्दन शिंदे यांनी सांगितले.
बिनविरोधसाठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न
वाईकरांची अस्मिता असलेल्या या बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अनेक सभासदांची इच्छा आहे. त्यासाठी बॅंकेचे आजी-माजी पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यांनी उमेदवारांशी संपर्क, चर्चा व बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. करोनामुळे बॅंकेच्या नफा क्षमतेत झालेली घट आणि निवडणूक प्रक्रियेमुळे बॅंकेवर पडणारा खर्चाचा बोजा, यामुळे बॅंक आर्थिक अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बॅंकेचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न अनेक सभासद आणि बॅंकेचे हितचिंतक करत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.