मोरगिरी – पाटण तालुक्यातील मोरणा विभागात गुरेघर परिसरामध्ये रविवार दि. 19 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ठाणे येथील माजी नगरसेवक मदन कदम (मल्हारपेठ ता. पाटण) याने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा जागीच म-त्यू झाला होता. तर एक जण जखमी होता. यातील जखमीवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी मदन नारायण कदम (वय 50) याच्यासह त्याची पत्नी नीता (वय 45), मुले योगेश (वय 22) व गौरव कदम (वय 25) यांच्यासह बारा बोरची बंदूक ताब्यात घेतली असून भादवि कलम 3, 25, 27, 34, 302, 307, 323, 504, 506 या अन्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच चौघांनाही सोमवार दि. 20 रोजी पाटण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. तत्पूर्वी, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख,
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे, सपोनि तृप्ती पाटील, मल्हारपेठचे सपोनि उत्तम भापकर यांनी पथकासह भेट दिली. गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक विवेक लावंड करत आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरेघर परिसरात मल्हारपेठ (कदमवाडी) येथील मदन कदम याचे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर कोरडेवाडी येथील श्रीरंग जाधव व गावातील ग्रामस्थ गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र, जाब विचारल्याच्या रागातून मदन कदमने पूर्वीच्या भांडणाचा राग व्यक्त करत गोळीबार केला. यामध्ये श्रीरंग जाधव (वय 45), सतीश सावंत (वय 30) हे दोघे जागीच ठार झाले.
तर प्रकाश जाधव (वय 42) जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, गोळीबारातील मृतांचे मृतदेह विच्छेदनासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यावेळीही रुग्णालय परिसरात लोकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह पाटण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांनतर दोन्ही मृतदेह अंत्यविधीसाठी कोरडेवाडी येथे नेण्यात आले. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
दरम्यान, मदन कदम ठाणे येथील माजी नगरसेवक असून त्याच्यावर अनेक छोटेमोठे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, ठाण्यासारख्या शहरात गुंडगिरी करणारा मदन कदम पवनचक्की, शेतजमिनी या माध्यमातून पाटण तालुक्यातील मोरगिरी विभागात गेल्या आठ- दहा वर्षापासून आपली दहशत पसरवत होता. या दहशतीमध्ये विभागातील सर्वसामान्य लोक वावरत होते. शेवटी मदन कदम या प्रवृत्तीने दोन निष्पाप जीवांचा अंत घेऊन शांत झाला आला का, असा संतप्त सवाल मोरणा विभागातील ग्रामस्थांमधून उमटत आहे.