धनकवडी : मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आल्याचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांत होणारी गर्दी टाळण्यासाठी सुटीच्या दिवशी ही दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाचे जनहित फाउंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले असून राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांचा संस्थेचे अध्यक्ष अँड. दिलीप जगताप यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे येत्या दोन आठवड्यांत होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून ३१ डिसेंबरपूर्वी केव्हाही नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्तनोंदणी करता येणार आहे. याबाबतचे आदेश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी दिले आहेत. याबाबतच्या सुचना राज्यातील सर्व नोंदणी उपमहानिरीक्षक आणि सह जिल्हा निबंधक यांना देण्यात आल्या आहेत.
याबाबत अँड. जगताप म्हणाले, ‘मुद्रांक शुल्क कमी करण्यात आल्याने दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. मुदांक शुल्क भरल्यानंतर त्यांना पुढील चार महिन्यांत दस्तनोंदणी करता येणार आहे. या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
नोंदणी व मुद्रांक शुल्काबाबत यापूर्वी काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सुटीच्या दिवशी दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच दस्तनोंदणीच्या वेळा वाढविल्या आहेत. त्यानुसार दस्तनोंदणी कार्यालये सकाळी ७.३० पासून रात्री ८.४५ पर्यंत दोन सत्रांत सुरू करण्यात आली आहेत.
– ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक