कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यात भाजपला राजकीय हादरा बसला. भाजपला रामराम ठोकून चार नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसमवेत सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
शैलेंद्र सिंह, अजॉय चटर्जी, राजदीप गुहा आणि सजल रॉय अशी तृणमूलमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावे आहेत. भाजपमध्ये भ्रमनिरास झाल्याने त्या नेत्यांनी पक्षबदल केल्याचा दावा तृणमूलकडून करण्यात आला.
भाजपचे अनेक नेते आमच्याबरोबर येतील, असा दावा वारंवार तृणमूलकडून केला जात आहे. त्यामुळे ताज्या घडामोडीला महत्व आहे. मात्र, चार नेत्यांच्या पक्षबदलाला भाजपने फार महत्व देण्याचे टाळले आहे.
भाजपमध्ये राहून तृणमूलशी संधान साधणारे लोभी नेते पक्ष सोडून गेले. त्यांचा खरा चेहरा उघड झाला. त्यांच्या पक्ष बदलण्याने भाजपचे कुठले नुकसान होणार नाही. भाजपचे कार्यकर्ते तृणमूलला सत्तेबाहेर घालवतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी फार कालावधी उरला नसल्याने त्या राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदलाच्या घटनांना उधाण येण्याची शक्यता आहे.