राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराच्या मनमानीमुळे आता सलग तिसऱ्या वर्षी सर्वसामान्य जनता, जमीन मालक आणि वाहन चालक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
काम करताना न घेतलेली खबरदारी, योग्य प्रकारे न काढलेली गटारे, रस्त्यावर येणारी माती व चिखल तसेच जागा मालक शेतकऱ्यांच्या शेतात टाकलेली माती, दगड आणि बंद केलेले रस्ते यामुळे जनता पुरती त्रस्त झाली आहे.
मात्र मंत्री, खासदार आणि आमदारांनी पाहणी करूनही संबंधित ठेकेदाराकडून कामात योग्य प्रकारे सुधारणा होत नसल्याने या लोकप्रतिनिधींचे दौरे केवळ फार्स ठरत आहेत. तर संबंधित विभागाचे अधिकारी देखील या ठेकेदाराच्या मनमानीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने तालुक्यात परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तालुक्यात वेगाने सुरू आहे. राजापूर तालुक्यातुन वाटूळ ते पुढे पन्हळे टाकेवाडी असा सुमारे ३४ किलोमीटरचा मार्ग आहे. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराच्या मनमानीमुळे दरवर्षी पावसाळ्यात सर्वसामान्य जनतेला, जमीन मालकांना आणि वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या राजापूर, कोदवली, साईनगर परिसरात उड्डाणपूल व रस्त्याचे काम सुरू आहे. तर पुढे वरचीपेठ परिसरात सर्वाधिक उंचीचा पूल व रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
कोदवली साईनगर परिसरात पावसात चिखलाचे साम्राज्य पसरले असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तर पुलाचे काम करतानाही नदीपात्रात टाकलेला भराव, नदीचा बदललेला प्रवाह आणि राजापूर, शिळ, गोठणे, चिखलगाव रस्ता बंद होण्याचा निर्माण झालेला धोका आजही कायम आहे.