पंढरपूर : पंढरपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्युमुखी पडले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झालं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहारचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज पहाटे ही दुर्घटना घडली असून पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरुन जाणाऱ्या चार बिहारी मजुरांना रेल्वेने धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी अवस्थेत दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यापैकी एकाची उपचारादरम्यान प्राणज्येत मालवली. त्यामुळे या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
हे चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही.
दरम्यान रुळाजवळ दारुच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. त्यामुळे या मजूर दारु प्यायले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.