बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. ही दुर्घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. हे चारही तरुण जांबुवंती नदीत पोहण्यासाठी गेले होत. या दुर्घटनेमुळे चिखली शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शेख साजीद शेख शफिक, वासीम शाह इरफान शाह, सय्यद रिझवान सय्यद फिरोज आणि शेख तौफिक शेख रफिक अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिखलीतील जुना गाव परिसरालगत असलेल्या जांबुवंती नदीत हे चौघे तरुण आंघोळीसाठी गेले होते. मात्र, ते चिखल्यात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते. या घटनेबाबत कळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या चौघा तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी ते चिखलीतील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांसह, नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान, चौघा तरुणांच्या अपघाती निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.