ओमान -जपानमध्ये यंदा होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या चार नौकानयनटूंनी पात्रता निकष पूर्ण करत पात्रता मिळवली आहे. नेत्रा कुमानन हिने गुरुवारी झालेल्या स्पर्धेतून पात्रता मिळवली होती. तिच्या पाठोपाठ विष्णू सारावानन, गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर यांनीही आपापल्या गटातून येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.
भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. नेत्रा कुमानन हिने बुधवारी लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाआधी विष्णू तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, त्याने थायलंडच्या किराती बुआलॉंग याचा पराभव करत एकूण दुसरे स्थान पटकावत टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली.
त्यानंतर चेंगाप्पा आणि ठक्कर यांनी 49 ईआर क्लास प्रकारात गुणतालिकेत सर्वोत्तम स्थान पटकावत ऑलिम्पिकचे स्थान प्राप्त केले. या दोघांनी इंडोनेशिया येथे झालेल्या 2018 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझपदकाची कमाई केली होती.