काम तात्पुरते बंद करण्याची कर्मचारी संघटनेची मागणी
नवी दिल्ली – बजाज ऑटो कंपनीच्या औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथील युनिटमधील चारशे कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचा दावा एका कामगार नेत्याने केला आहे. त्यामुळे या कंपनीतील काम काही दिवसांकरीता थांबवण्यात यावे अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. तेथील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष थेंगडे बाजीराव यांनी ही मागणी केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
वाळुंजच्या प्लान्टमध्ये सुमारे तीन हजार कामगार काम करीत आहेत. त्यांनी कंपनीच्या स्थानिक आधिकाऱ्यांकडेही काम तात्पुरते बंद ठेवण्याची मागणी केली आहे. काम बंद ठेवल्याने कामाचे जितके तास बुडणार आहेत ते तास आम्ही जादा काम करून भरून देऊ अशी ग्वाहीही या कामगारांनी दिली आहे.
थेंगडे यांनी म्हटले आहे की, चारशेहून अधिक कामगारांना करोनाची बाधा झाली असून त्यातील सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. यावर कंपनीनेही उपाययोजना सुरू केली आहे पण तरीही करोनाच्या तेथील केसेस वाढतच आहेत असेही त्यांनी सांगितले. कंपनीच्या प्लांटमधील काम बंद ठेवण्याबाबत कामगार संघटनांची व्यवस्थापनाशी बोलणी सुरू आहेत पण अजून त्यात तोडगा निघालेला नाही.
बजाज कंपनीचे देशात एकूण तीन प्लांट असून वाळुज, चाकण आणि उत्तराखंड मधील पंतपनगर येथे हे प्रकल्प आहेत. बजाजच्या वाळुज प्लांटमध्ये डिस्कव्हर, प्लाटिना, सीटी-100, बॉक्सर अशा दुचाकी वाहनांचे आणि रिक्षांचे उत्पादन केले जाते.