पुणे – ऍट्रॉसिटीच्या प्रकरणात चार शेतकऱ्यांना सत्र न्यायाधीश एस.व्ही. सहारे यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनाची तरतुद नाही. मात्र, या प्रकरणात महसुल अधिकाऱ्यासमोर सिव्हील प्रकरण प्रलंबित असल्याने एफआयआर दाखल केली अहे. तपास पूर्ण झाला आहे. तक्रारीच्या अनुषंगाणे कोणीही साक्षीदार नाहीत. प्रथमदर्शनी ऍट्रॉसिटी लागू होत नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला.
बबन शंकर खटाटे (वय 82), त्यांचा मुलगा पोपट (वय 47) , भाऊसाहेब निवृत्ती खटाटे (वय 40) आणि गजानन अंकुश जाधव (वय 53 सर्वजण, रा. झेंडेवाडी, ता. पुरंदर) अशी त्या चौघांची नावे आहेत. चौघांनी ऍड. रोहन विनायक करकंडे आणि ऍड. समीर ज्ञानदेव काळे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
चौघांविरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सर्वजण शेतकरी असून, त्यांचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केलेली नाही. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकाविण्यात आलेले आहे. शेताच्या बांध रस्त्यासंदर्भात अनेक वर्षांपासून आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये वाद चालू आहे. याबाबतचे प्रकरण पुरंदर तहसिलदारांचे समोर प्रलंबित आहे. त्यामुळे अटकपूर्व देण्याची मागणी ऍड. रोहन विनायक करकंडे आणि ऍड. समीर ज्ञानदेव काळे यांनी केली.