पालघर : देशासह राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे सर्व जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. नुकंतच पालघर स्थानकावर चार करोना संशंयित रुग्ण आढळले आहेत. या सर्वांच्या हातावर क्वारंटाईन केल्याचे शिक्के होते.
तरीही हे रुग्ण गरीब रथ एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान वांद्रयाहून दिल्लीकडे गरीबरथ एक्सप्रेस या रेल्वेने चार करोना संशयित रुग्ण प्रवास करत होते. जी4-जी5 या डब्ब्यातून हे रुग्ण प्रवास करत असताना पालघर स्टेशन दरम्यान काही प्रवाशांना शंका आली.
तसेच तिकीट तपासनीस यांनीही याबाबतच चौकशी केली. त्यावेळी त्या चौघांच्या हातावर विलगीकरण (क्वारंटाईन) केल्याचे शिक्के होते. हे चारही जण जर्मनीहून मुंबईत आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून ते चौघे सूरतला जात होते.
मात्र त्या दरम्यान प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे या गाडीला पालघर स्थानकावर थांबा देत या संशयित रुग्णांना पालघरला उतरवण्यात आले. पालघरच्या आरोग्य पथकाकडून त्यांची तपासणी सुरु आहे. त्यांना त्यांच्या मूळ गावी खासगी वाहनातून रवानगी करण्याचा विचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान हातावर विलगीकरण (क्वारंटाईन) केल्याचे शिक्के असणाऱ्यांना रेल्वेचा प्रवास करण्यास मज्जाव केला आहे. मात्र तरीही हे रुग्ण प्रवास करत होते.
तर दुसरीकडे डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात एका रुग्णाला विलगीकरण वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत आहेत.