मावळ लोकसभा ः छाननीनंतर आता लक्ष माघारीकडे
यावेळी नामसाधर्म्य असलेला उमेदवारच नाही ः गत निवडणुकीत दोन नावांचे होते
पिंपरी – मंगळवारी अर्ज दाखल करण्याची अवधी संपेपर्यंत 32 उमेदवारांचे 45 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी अर्ज छाननी करण्यात आली. या छाननीत चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आता मावळ लोकसभेच्या रिंगणात एकूण 28 जण शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी मावळच्या रिंगणातील एकूण उमेदवारांची स्थिती स्पष्ट होईल. यामुळे कितीजण माघार घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत एकूण 32 जणांनी 45 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये तीन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. बुधवार हा उमेदवारी अर्जाच्या छाननीचा दिवस होता. आज उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीसमक्ष निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी अर्जांची छाननी केली. यामध्ये चार जणांचे अर्ज विविध कागदपत्रांचा अभाव तसेच तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले. उमेदवारी अर्ज बाद झालेल्यांमध्ये सुभाष घोलपराव बोधे, निखिल रामचंद्र हरपुडे, शाम अभिमन्यू घोडके, शिवाजी तानाजी धोंडे यांचा समावेश आहे. या चारही उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज सादर केले होते.
शुक्रवार दि. 12 एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून कितीजण माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या रिंगणात 16 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास प्रत्येक मतदारकेंद्रावर दोन ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे. गतवेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात होते.