पालिकेचा प्रताप; मंगळवार पेठेतील विठ्ठल जंगम यांना मन:स्ताप
सातारा – मंगळवार पेठेतील विठ्ठल धोंडिराम जंगम यांच्याकडे वैयक्तिक नळ कनेक्शन नसतानाही सातारा पालिकेने एक वर्षाच्या साडेदहा हजार रुपयांच्या पाणीपट्टीचे बिल पाठवण्याचा प्रताप केला आहे. पालिकेच्या कारभारामुळे जंगम यांना मनःस्ताप सहन करावा लागला असून या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त होत आहे .
पालिकेने 2019-20 या आर्थिक वर्षात नागरिकांना घरपट्टी व पाणीट्टीची बिले पाठविली आहेत. या बिलांच्या वितरणात सुसूत्रता नसल्याने शहराच्या पश्चिम भागात एकाच खातेदाराला दोन वेळा पाणीपट्टी आकारणीची बिले धाडण्याचा चमत्कार वसुली विभागाने केला आहे.
तांत्रिक चुकीमुळे एखाद्या नळ कनेक्शनला जादा पाणीपट्टी आकारली गेल्याची उदाहरणे आहेत. मात्र, नळ कनेक्शन घरात नसतानाही पाणीपट्टी आकारण्याचा अजब प्रकार पालिकेने केला आहे. मंगळवार पेठेतील विठ्ठल जंगम यांना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीसाठी साडेदहा हजार रुपयांची आकारणी पालिकेने केली आहे.
फा बिलात मागील थकबाकी साडेआठ हजार रुपये व चालू पाणीपट्टी दोन हजार रुपये, असे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात वसुली विभागाच्या हिमाली कुलकर्णी म्हणाल्या, यंदा प्रथमच वार्षिक पाणीपट्टी नागरिकांना स्वतंत्र पाठवण्यात आली आहे. बिलाच्या नोंदी करताना तांत्रिक चुका झाल्याची शक्यता आहे. संबंधित नागरिकाने वसुली विभागाशी तात्काळ संपर्क साधावा.
दरम्यान, पालिकेच्या अजब कारभारामुळे जंगम यांना मनःस्ताप झाला आहे. पाणी पुरवठा विभागात वारंवार चकरा मारूनही त्यांच्या तक्रारीची कोणी दखल घेतली नाही.
त्यांनी सहा महिन्यांपूर्वी नळ कनेक्शनसाठी अर्ज केला होता. त्यासाठी अनामत रक्कम भरूनही पालिकेने त्यांना कनेक्शन दिलेले नाही. मात्र, नळ कनेक्शन नसतानाही सप्टेंबर महिन्यात जंगम यांना साडेदहा हजार रुपयांचे बिल पालिकेने पाठवले आहे. आधी नळ कनेक्शन जोडायला विलंब आणि त्यावर कहर म्हणजे नसलेल्या नळ कनेक्शनसाठी साडेदहा हजार रुपये पाणीपट्टी आकारण्यात आल्याने जंगम वैतागले आहेत. या बिलासंदर्भात कोणीच दाद घेत नसल्याने आणि पाण्यासारखी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने जंगम यांचा धीर सुटत चालला आहे.
नागरिकांच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही
टक्केवारीच्या घोळात सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांना आपण येथे नागरिकांसाठी निवडून आलो आहोत, याचा विसर पडला आहे. बायोमायनिंगचे टेंडर कसे फुगवता येईल यासाठी फिल्डिंग लागते. मात्र, नसलेल्या नळ कनेक्शनचे साडेदहा हजार रुपयांचे बिल घेऊन पालिकेत फिरणारा नागरिक कोणालाच दिसत नाही. त्यामुळे पदाधिकारी व अधिकारी किती निर्लज्ज झाले आहेत, ते दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.