-माधव विद्वांस
उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणारे इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर यांची आज जयंती. (16 मार्च 1693-20 मे 1766). एक कर्तबगार सेनानी. त्यांचा जन्म जेजुरीजवळ होळ येथे झाला. त्यांचे वडील खंडूजी हे चौगुला-वतनदार होते. मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. भाऊबंदकीमुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे माहेरी आपल्या भावाकडे म्हणजेच भोजराज बार्गल यांचेकडे गेली.
भोजराजाने आपला पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय न करता एक लष्करी पथक स्थापन केले होते. भोजराज दाभाडे सरकार यांच्याकडील सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होते. त्यामुळे मल्हारराव मामाकडील लष्करात भरती झाले. मल्हाररावांचा मामा त्यावेळी पेशव्यांचे बाजूस होते. 1720 मध्ये झालेल्या पेशवे-निजाम संघर्षात आपल्या कर्तृत्वाने मल्हाररावमधील गुण बाजीराव पेशव्यांनी हेरले व त्यांना स्वतःच्या घोडदळात घेतले. येथूनच मल्हाररावांचे आयुष्य बदलले. मल्हाररावांचे लहानपण खानदेशातच मामाकडे गेल्याने त्या भागाची त्यांना माहिती होती.
बाजीरावांनी वर्ष 1725 मध्ये मल्हाररावांना पाचशे घोडेस्वारांसह उत्तर खानदेशची जबाबदारी सोपविली. त्याबरोबरच लागून असलेल्या माळवा प्रांतातील चौथाई आणि सरदेशमुखी जमा करण्याची जबाबदारीही सोपविली. मात्र, आपल्या मामाच्या आश्रयामुळेच बाजीरावांकडे संधी मिळाली ही गोष्ट ते कधीच विसरले नाहीत. त्यांनी त्यांच्या पथकाचा झेंडाही कदमबांड्यांच्या झेंड्यासारखाच ठेवला. वर्ष 1725 मध्ये नर्मदेच्या उत्तरेकडील मराठ्यांनी जिंकलेल्या प्रदेशाचे सर्व अधिकार पेशव्यांनी त्यांच्यावर सोपविले.
माळव्यात आमझेरा येथे मुघल सरदार गिरीधर बहादूर व दया बहादूर यांच्यासोबत बाजीरावांनी लढलेल्या लढाईत ते दोघेही मारले गेले व माळव्यात मराठ्यांचे पाय घट्ट रोविले गेले. ग्वाल्हेरचे शिंदे व धारचे पवार यांसारखेच मल्हारराव हे पेशव्यांतर्फे इंदूर संस्थानचे अधिपती झाले.
मल्हाररावांनी 1735-38 दरम्यान नानासाहेब पेशव्यांबरोबर भोपाळ, गुजरात, अंतर्वेदी, दिल्ली, कोकण, वसई व आग्रा या ठिकाणी झालेल्या युद्धांत पराक्रम केला. त्यानंतर वर्ष 1745 मध्ये मल्हाररावांकडे साडेचौऱ्याहत्तर लक्षांचा मुलूख देण्यात आला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार होऊन मराठी राज्याचे साम्राज्य निर्माण झाले. मल्हाररावांनी कारभारासाठी इंदूरमध्ये अनेक मराठी माणसे आणली. तेव्हापासून इंदूर हे मराठमोळे झाले.
भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्याबरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र (खंडेराव) झाला. वर्ष 1733 मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबाईंबरोबर खंडेरावचा विवाह झाला. 17 मार्च 1754 मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याचे मोहिमेवर असताना खंडेरावांना तोफेचा गोळा लागून वीरगती मिळाली. त्यावेळी मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून रोखले.
सध्याच्या पाकिस्तानातील अटकपर्यंत मराठ्यांचा झेंडा पोहोचविण्यात राघोबादादांबरोबर खांद्याला खांदा भिडवून मल्हारराव आघाडीवर होते. पानिपत युद्धानंतर मराठेशाहीची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी थोरले माधवराव पेशवे यांना मोलाचे सहाय्य केले. एका मोहिमेत 20 मे 1766 रोजी आलमपूर येथे त्यांचा मृत्यू झाला.