पारनेर – पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीस अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्याने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लॉकडाउन हटल्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळाला. त्यातच केंद्र सरकाने निर्यात बंदीचा निर्णय घेवून शेतकऱ्यांची झोप उडवली. या साऱ्या अडचणींवर मात करत चोंभूत येथील शेतकरी नारायण केरू बरकडे यांनी कांदा साठवून ठेवला होता. मात्र अज्ञात इसमाने त्यांचा कांदा चाळीस आग लावली. त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर कांदा चाळीत सुमारे 300 गोणी इतका कांदा होता. साधारण 100 गोणी कांदा जळून खाक झाला. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा पंचनामा केला आहे. याबाबत बरकडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बरकडे यांनी 3 दिवसांपूर्वी कांदा चाळ ही कांदा व्यापाऱ्याला साडेचार लाख रुपयांना दिली होती. मात्र हातात पैसे पडण्याआधीच अज्ञात इसमाने कांदा चाळ पेटवून दिल्याने बरकडे यांना मोठा आर्थिक फटाका बसला आहे.