नवी दिल्ली – विराट कोहली सतत अपयशी ठरत असून अनेक आजी माजी क्रिकेटपटू त्याला सल्ला देत आहेत. अशातच माजी कसोटीपटू अजय जडेजा याने कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी संवाद साध असा सल्ला दिला आहे.
केवळ सचिनच कोहलीला योग्य मार्ग दाखवू शकतो. खुद्द सचिनलाही अशाच अपयशी कालखंडातून जावे लागले होते. त्यावेळी त्याने काय केले, तसेच कोणत्या पद्धतीने सराव केला. एकूणच या बॅडपॅचमधून बाहेर पडण्यासाठी काय केले पाहीजे, हे सचिनशिवाय अन्य कोणीही सांगू शकत नाही, असेही जडेजा म्हणाला.
आज जागतिक क्रिकेटमध्ये सचिन हा एकमेव खेळाडू असा आहे की जो केवळ भारताच्याच नव्हे तर कोणत्याही देशाच्या क्रिकेटपटूचे कमकुवत दुवे हेरून त्याला योग्य सल्ला देऊ शकतो, असेही जडेजाने म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या जवळपास तीन वर्षांत कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी किंवा शतकी खेळी घडलेली नाही. 2019 साली बांगलादेशविरुद्धच्या शतकी खेळीत त्याने आपले 70 वे आंतरराष्ट्रीय शतक साकार केले होते, त्यानंतर मात्र, त्याला अद्याप शतक फटकावता आलेले नाही.