लाहोर – करोनामुळे जगभरात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत तर, अनेकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, पाकिस्तानी आजी माजी क्रिकेटपटूंचे डोके करोनामुळेच फिरले की काय असा प्रश्न नेटीझन्सनी केला असून माजी कसोटीपटू अकिब जावेद याच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
मॅच फिक्सिंगचे केंद्रस्थान भारत असल्याचे जावेद बरळला होता. 1999-2000 पासून खरेतर मॅच फिक्सिंग जेव्हा जेव्हा उघड झाले त्यात पाकिस्तानच्या खेळाडूंची नावे आली होती. सलिम मलिकपासून आताच्या उमर अकमलपर्यंत त्यांचे खेळाडू या प्रकरणात दोषी आढळले आहेत. मात्र, गिरे भी तो टांग उपर हेच ब्रिद सिद्ध करत अकिब जावेदने यासाठी भारतावरच खापर फोडण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला आहे. मॅच फिक्सिंग, सट्टेबाजी, बुकिंशी संबंध आणि स्पॉट फिक्सिंग यांचे केंद्र भारतच असल्याचे त्याने व्यक्त केले होते.
1999 साली जावेदनेच मॅच फिक्सिंगचा खुलासा करताना सलिम मलिकवर आरोप केला होता. त्यावेळी त्याला सट्टेबाजांकडून धमक्यांचे फोन आले होते. पाकिस्तानात अनेक खेळाडू यात गुंतल्याचेही त्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला सांगितले होते. भारतीय सट्टेबाज व बुकी हेच खरे सूत्रधार आहेत. तेच जागतिक क्रिकेटमध्ये अनेक सामन्यांसाठी फिक्सिंग करतात. वसीम अक्रम, वकार युनुस हे देखील मलिकसह यात गुंतलेले आहेत असेही जावेदने त्यावेळी सांगितले होते.
आयपीएल, पीसीएल, कॅरेबियन लीग यांसह विविध देशांत होत असलेल्या या स्पर्धा डागाळलेल्या आहेत. फिक्सिंगचे सर्वात जास्त प्रकार व सट्टेबाजी आयपीएल व पीसीएलमध्येच घडते व त्याला भारतातील आश्रयदाते पाठिंबा देतात असा आरोपही जावेदने केला.
भारतात महंमद अजहरुद्दीन, नयन मोंगिया, अजय जडेजा, अजय शर्मा, निखिल चोप्रा, मनोज प्रभाकर या खेळाडूंनर आरोप झाले. त्यात अजहरवर तहहयात बंदी लावली गेली. जडेजा व शर्मा यांच्यावर पाच वर्षांची बंदी लावली होती. बाकी खेळाडूंना पुराव्या अभावी क्लीनचीट दिली गेली होती.
जडेजा बंदीनंतर देशांतर्गत क्रिकेट खेळला तसेच आता तो क्रिकेट विश्लेषक म्हणून कार्यरत आहे.
पाकिस्तानने देखील स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी असलेल्या महंमद आमीर यालाही पाच वर्षांच्या बंदीनंतर देशाच्या संघात स्थानही दिले आहे. हे सगळे पाहिले तर असे जाणवते की ज्यांनी भ्रष्टाचार केला, फिक्सिंग केले त्यांना पुन्हा संधी देणे हा मूर्खपणा आहे. पण पाकिस्तान मंडळाचाही हा दोषच आहे. एकदा एखाद्याने फसवले तर त्याला पुन्हा संधी देणे ही आणखी मोठी चूक नव्हे का, असा सवालही जावेदने केला आहे.
नेटीझन्सकडून अकीब झाला ट्रोल
आयपीएलच्या सुरवातीच्या मोसमात पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनीही सहभाग घेतला होता. त्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेल्याने त्यांच्या खेळाडूंवर बीसीसीआयने निर्बंध घातले व त्यांच्या कोणत्याही खेळाडूला आयपीएलच्या संघात स्थान न देण्याचे संकेत दिले गेले. तेव्हापासूनच पाकिस्तानचे आजी माजी क्रिकेटपटू वाट्टेल ते बरळू लागले आहेत. जावेद मियांदाद, इम्रान खान, शाहिद आफ्रिदी, सर्फराज नवाज, शोएब अख्तर व आता अकिब जावेद यांना नैराश्य आले असून करोनामुळे बहुदा त्यांच्या डोक्यावरही परिणाम झाल्याचेच यातून स्पष्ट होत आहे अशा शब्दात नेटीझन्सने या सर्वांना ट्रोल केले आहे.