खडकवासला (पुणे) – खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 9 मुली पाण्यात बुडाल्या होत्या. पण, स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नऊ मुलींपैकी सात मुलींना वाचवण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. शितल भगवान टिटोरे, खुशी संजय खुर्दे अशी मृत्यू पावलेल्या मुलींची नावे आहेत. 9 पैकी 7 मुलींना वाचवण्यात यश आल्याने माजी सरपंच आणि गावकऱ्यांचे कौतुक होत आहे.
हवेली तालुक्यातील मालखेड गावचे माजी सरपंच राजेंद्र जोरी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह गोऱ्हे खुर्द या ठिकाणी सावडण्याच्या कार्यक्रमास गेले होते. स्मशानभूमीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या नदीपात्राच्या ठिकाणावरून अचानक वाचवा..वाचवा… असा आरडाओरडा सुरू असल्याचे जोरी आणि त्यांच्या सहकऱ्यांना ऐकू आले.
क्षणाचाही विलंब न करता सावडण्याच्या कार्यक्रमामधूनच संजय माताळे, राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे, रमेश भामे हे आवाजाच्या दिशेने मदतीसाठी धावले. बुलढाणा येथून लग्नकार्य व बारशासाठी आलेल्या व पोहण्यासाठी गेलेल्या या नऊ पैकी सात जणींना शेतकरी संजय माताळे यांनी पाण्याबाहेर काढले. त्यानंतर लगेच माजी सरपंच राजेंद्र जोरी व बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या गाडीतून खानापूर येथील आरोग्य केंद्र व खडकवासला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांच्या या प्रसंगावधानामुळे सात मुलींची प्रकृती स्थिर आहे. सिंहगड परिसरातील शेतकऱ्यांच्या धाडसाने या सात जणींना बुडताना वाचवण्यात यश आले आहे. मात्र दोन जणी हाताला न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र इतर सात मुलींचे प्राण वाचवल्यामुळे सिंहगड पंचक्रोशीतील सर्व स्तरातून या शेतकऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मीना संजय लहाने, शितल अशोक धामणे, राशी सुरेश मांडवे, पायल संजय लहाने, प्रीती संजय लहाने, कुमुद संजय खुर्दे, पायल संतोष सावडे अशी बचावलेल्या मुलींचा नाव असून शितल भगवान टिटोरे, खुशी संजय खुर्दे यांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला.