घुराम राजन यांनी थेट केले लक्ष्य
नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची सध्या जी दुर्दशा झाली आहे त्यावरून पुन्हा मोदी केंद्रीत धोरणावर बोट ठेवले आहे. त्यांनी म्हटले आहे की मोदींच्या भोवती असलेल्या काही व्यक्तींच्या हातातच सारी निर्णय शक्ती आणि आणि आधिकारांचे केंद्रीयकरण झाले आहे त्यातूनच ही समस्या बिकट बनली आहे.
एका नियतकालिकात लिहीलेल्या लेखात त्यांनी हे मनोगत व्यक्त केले आहे. देशाची सारी निर्णय प्रक्रिया पंतप्रधान कार्यालयात एकवटली असून या निर्णय केंद्रीयकरणातच साऱ्या समस्येचे मूळ दडले आहे. पंतप्रधानांच्या भोवती असलेले काही जणांचे टोळके केवळ निर्णयच घेत नाही तर अर्थव्यवस्थेच्या संबंधातील काही अजब कल्पनाही तेथूनच मांडल्या जातात. पंतप्रधान कार्यालयातून त्याची अंमलबजावणी होते. अशा प्रकारचा केंद्रीभूत कारभार एखाद्या राजकीय पक्षासाठी योग्य असू शकतो पण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मात्र तो विनाशकारी ठरतो असे त्यांनी म्हटले आहे. या बाबतीत मागच्या युपीए सरकारचे काम अधिक योग्य होते अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. त्यांनी म्हटले आहे की मागचे सरकार आघाडीचे काहीसे विस्कळीत सरकार असले तरी त्यांनी आर्थिक उदारीकरणाची पुढची पावले टाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
भारताच्या आर्थिक मंदीवर परिणामकारक उपाययोजना करायची असेल तर प्रथम सरकारने देशात मंदीचे वातावरण आहे हे मान्य केले पाहिजे अशी मोैलिक सुचनाही राजन यांनी यात केली आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची करायची असेल तर आत्तापासूनच देशाने 8 ते 9 टक्के जीडीपी दराने विकास साधला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.