Ramiz Raja – भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. प्रत्येक सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज कमालीची कामगिरी करत आहेत. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल आणि विराट कोहलीने उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. त्याचहाबरोबर गोलंदाजीत मोहम्मद सिराजसह मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांनी चमकदार कामगिरी केली आहे. याच महिन्यातील मागील दोन एकदिवसीय मालिका पहिल्या तर भारताने घरच्या मैदानावर आपणच सिकंदर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. भारतीय संघाची हीच कामगिरी येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे, कारण ही मोठी स्पर्धा भारतातच होणार आहे.
Mohammad Siraj । सिराजच्या भन्नाट गोलंदाजीने रचला नवा रेकॉर्ड; इतर गोलंदाज आसपासही नाहीत
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनीं भारतीय संघाचे कौतुक केले आहे. यावेळी ते पाकिस्तान संघाला घरचा आहेर द्यायलाही विसरले नाही. त्यांनी भारताच्या घरेलू मैदानावरील कामगिरीवरून पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला खोचक सल्ला दिला आहे. भारतीय संघाने शनिवारी रायपूरमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहज विजय मिळवत मालिकेतही २-०ने विजयी आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघाचे कौतुक करताना ‘घरच्या मैदानावर कसे जिंकायचे हे भारताकडून शिकायला हवे’, असा सल्ला रमीझ राजा यांनी दिलाय.
भारतीय संघाने विश्वचषक २०२३ मोहिमेची सुरुवात केली आहे. संघाने २०२३ च्या विश्वचषकाच्या आधी घरच्या मैदानावर बलाढ्य संघाना पराभवाची धूळ चारली आहे. यामध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंडला पराभूत करून भारताने विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने पाऊले टाकली आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाची घरेलू मैदानावरील कामगिरी पाहता त्यांना पराभूत करणे सहज शक्य नाही.
भारतीय संघाची घरेलू मैदानावरील कामगिरीवरून रमीझ राजा यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला धारेवर धरले आहे. कारण मागील काही सामन्यात पाकिस्तानला घरच्याच मैदानावर सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रमीझ राजा यांनी म्हटले की, “घरच्या मैदानावर कसे वर्चस्व गाजवायचे हे पाकिस्तानी संघाने भारताकडून शिकले पाहिजे. टीम इंडियाला भारतामध्ये हरवणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे या खंडातील सर्व संघांसाठी आणि अगदी पाकिस्तानसाठीही हा एक धडा आहे. पाकिस्तानी संघाकडे पुरेशी क्षमता आहे, मात्र, निकाल किंवा मालिका विजयाच्या बाबतीत घरची कामगिरी टीम इंडियाइतकी सातत्यपूर्ण नाही. विश्वचषक स्पर्धेतील भारतासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
‘Learn from India’: Ramiz Raja advises Babar Azam & Co.
Read More: https://t.co/ktubW2wLHT#INDvNZ pic.twitter.com/pzGyHaKOi3
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) January 22, 2023
यावेळी रमीझ राजा यांनी न्यूझीलंडच्या संघाच्या तुलनेत टीम इंडियाची प्रशंसाही केली आहे. राजा यांनी म्हटले की, “सामन्यातील परिस्थिती योग्यप्रकारे समजून घेणे हे चांगल्या संघाचे लक्षण असते. भारतीय गोलंदाजांमध्ये वेगाची कमतरता असतानाही त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध परिपूर्ण कामगिरी केली आहे. न्यूझीलंडनेही आपला खेळ केला मात्र ते हरले. कारण भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या फलंदाजीत आत्मविश्वासाचा अभाव पाहायला मिळाला.”