अपयशाचे उत्तरदायित्व ठरविण्याची आवश्यकता
कराची – पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेतील साखळी गटातच बाद होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या या खराब कामगिरीचे उत्तरदायित्व ठरविण्याची आवश्यकता असून संबधित खेळाडू व सपोर्ट स्टाफवर योग्य कारवाई करण्याची आवश्यकता आहे अशा शब्दांत ज्येष्ठ खेळाडू बासित अली यांनी पाकिस्तान संघावर टीका केली आहे.
ऑस्ट्रेलियाचे उदारहण देत अली यांनी सांगितले की, ‘चेंडू कुरतडण्याच्या घटनानंतर त्यांच्या क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली होती. दोषी खेळाडूंवरही कारवाई झाली. ही घटना इतिहासजमा झाली आहे व आम्ही येथे पुन्हा विश्वचषक जिंकण्याचाच विचार करीत खेळत आहोत असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवीत त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे’. असा दृष्टिकोन आमच्या खेळाडूंकडे दिसून येत नाही.
संघाची कामगिरी खराब झाली तर त्याची हकालपट्टी करण्यास ऑस्ट्रेलियन संघटक मागेपुढे पाहत नाहीत. त्याप्रमाणे आमच्या मंडळाने कठोर निर्णय घेतले पाहिजेत. ज्येष्ठ क्रिकेटपटू मोईनखान यांनी मात्र पाकिस्तानच्या खेळाडूंबाबत मवाळ धोरण घेतले आहे.
त्यांनी सांगितले की, ‘आमच्या संघाची कामगिरी खूप वाईट नाही. बाद फेरीच्या त्यांच्या आशा मावळल्या असल्या तरी त्यांनी आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. आमच्या मंडळाने संघाची प्रतिष्ठा उंचविण्यासाठी योग्य प्रयत्न केले पाहिजेत’.