पुसेगाव – सुवर्णनगरी पुसेगावचे (ता. खटाव) सुपुत्र आणि मुंबई, पुण्याचे माजी पोलीस आयुक्त डी. एन. उर्फ धनंजय नामदेवराव जाधव यांचे पुणे येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. पुसेगाव या मूळगावी मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. जाधव यांच्या निधनाने पुसेगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
धनंजय जाधव यांचा जन्म पुसेगाव येथे 1947 साली झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण, तर वाई येथे माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी एम. एससी. ही पदव्युत्तर पदवी घेतली. प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले.
1972 मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण झाले. ते भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. पुणे येथे पोलीस उपायुक्त (डीसीपी) म्हणून काम केल्यानंतर मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी 2004-07 या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी झाली होती. या पदावर 2007-08 या कालावधीत काम करून ते सेवानिवृत्त झाले होते.
निवृत्तीनंतर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मंडळावर बोर्डवर दोन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी पुसेगावात शिक्षण संस्था सुरू केली. शेती करत ते या संस्थेचे काम पाहत होते. धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. निवृत्तीनंतर त्यांना अनेक राजकीय पक्षांनी राजकारणात प्रवेश करण्याचा प्रस्ताव दिले होते; परंतु त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहायचा निर्णय घेतला होता.
जाधव यांच्यावर पुसेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, माजी सभापती संदीप मांडवे उपस्थित होते. पंचक्रोशीतील हजारो लोकांनी साश्रू नयनांनी जाधव यांना अखेरचा निरोप दिला. त्यांना श्रद्धांजली म्हणून काही वेळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.