नाशिक – महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते विनायकदादा पाटील यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते पण अलिकडेच त्यांना किडनीवरील उपचारासाठी पुन्हा नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले.
विनायकदादा पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जात होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना उद्योग, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण अशी खाती सांभाळली होती. त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.
वनांचा विस्तार आणि संरक्षणासाठीही त्यांनी मोठे काम केले होते. त्यामुळे कुसुमाग्रजांनी त्यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती. त्यांच्या मागे दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे.