जामखेड – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले आहे. त्यासोबतच चर्चा सुरू झाली, ती कुणाला शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागणार याची.जिल्ह्यातून संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विधानपरिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबत पालकमंत्रीपदही शिंदेंना संधी मिळणार असल्याची चर्चा तालुक्याभर होत आहे.
आ. शिंदे हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी कर्जत-जामखेड विधानसभेवर दोन वेळा निवडून आले होते. सन 2009 मध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आरक्षण बदलले. भाजपकडून राम शिंदे यांनी तेथून विजय मिळवला. तेव्हाही त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध होताच. त्याचवेळी ते भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले, पुढे नंतर प्रदेश सरचिटणीस. सन 2014 च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले आणि भाजपच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. सुरुवातीच्या काळात ते भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात.
पुढे काळाची पावले ओळखत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. त्यातूनच पंकजा मुंडे यांच्याकडील “जलसंधारण’ हे खाते व कॅबिनेट मंत्रिपदाची बढती अशी सोनेरी संधी राम शिंदे यांना मिळाली. सन 2019 मध्ये रोहित पवारांसारख्या तरुणाकडून पराभव पत्करण्याची वेळ त्यांच्यावर आली. पराभवानंतर पक्ष व फडणवीस यांच्याशी असलेली एकनिष्ठता पाहून भाजप प्रदेश समितीत त्यांचा समावेश करण्यात आला. शिंदे यांच्या रूपात धनगर समाजातील एक सुसंस्कृत व पक्षनिष्ठ चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
भाजपचे सरकार आल्यास शिंदे यांची मंत्रीपदी वर्णी लागेल आणि मतदारसंघात पुन्हा करोडोंचा निधी येण्याचा मार्ग मोकळा होईल. एकूणच सरकार कोणाचेही येवो आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून मतदारसंघाला पुढील दोन अडीच वर्षे निधी कमी पडणार नाही.
जनतेशी पुुन्हा नाळ जोडणार का?
आ. शिंदे हे जेव्हा आमदार होते. तेव्हा त्यांचा संपर्क हा चांगला होता. परंतु ते मंत्री झाले तेव्हा त्यांची जनतेशी असणारी नाळ तुटली आणि त्यांचा संपर्क हा फक्त ठेकेदार व प्रत्येक गावातील बगलबच्चे यांच्याशी वाढला. मतदारसंघात विकासच केला असे नाही, परंतु तो विकास दिसला नाही. ठेकेदारांची टोळीच त्यांच्या जवळ जास्त असल्याने त्यांना विकास दाखवता आला नाही. प्रत्येक गावात किती निधी दिला, ही कोटीची कोटी उड्डाणे फलकावर दिसत होती, मात्र विकास दिसत नव्हता. तो न दिसण्यास कारण म्हणजे स्थानिक पुढाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवला नाही. शिंदे यांचा पराभवाला त्यांच्या सभोवतालच्या टक्केवारीतील गोतावळ्यामुळेच झाला.