नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी झारखंडचे माजी मंत्री के एन त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी फेटाळण्यात आल्याने पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोनच उमेदवार आता निवडणूक रिंगणात उरले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत 8 ऑक्टोबर अशी असून या दिवसापर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर या दुरंगी लढतीसाठी मतदान होणार आहे.
कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, शनिवारी फॉर्म छाननीसाठी पॅनेलची बैठक झाली.त्यात त्रिपाठींचा अर्ज बाद झाला आहे. त्रिपाठींच्या अर्जातील एका प्रस्तावकाची सही जुळत नसल्याने आणि दुसऱ्या प्रस्तावकाच्या स्वाक्षरीची पुनरूक्ती झाल्याने त्यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आला आहे. आता मतदानाची वेळ आल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.
या निर्णयावर प्रतिक्रीया देताना थरूर यांनी ट्विट केले की, “छाननीनंतर, खरगे आणि मी कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी मैत्रीपूर्ण लढतीत उतरणार आहोत हे जाणून आनंद झाला. पक्षातील या लोकशाहीं प्रक्रियेचा सर्वांनाच लाभ होईल असे त्यांनी म्हटले आहे. या निवडणुकीसाठी देशभरातून नऊ हजार मतदार मतदान करणार आहेत.