पणजी : देशातील कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघत आहे. कारण माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आमच्यासाठी गोव्यात भाजप संपली असल्याचे खळबळजनक वक्तव्य गोव्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय म्हणजे राजकीय चूक होती, असे विधान गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केलं आहे. सरदेसाई यांनी या निर्णयाबद्दल लोकांची माफी मागितली आहे. विजय सरदेसाई यांनी रविवारी त्यांच्या दक्षिण गोव्यातील फतोरदा मतदारसंघात लोकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले, राज्यातील भाजपाचं सरकार अकार्यक्षम, अपारदर्शक व प्रशासकीय उत्तरदायीत्व नसलेलं सरकार आहे. भविष्यात असं सरकार स्थापन करण्यास कोणतीही मदत करणार नाही. मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर आपल्यासाठी भाजपा संपली आहे. आम्ही भविष्यात कधीही भाजपाचे सरकार स्थापन होऊ देणार नाही, असे सरदेसाई म्हणाले.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सरकारला पाठिंबा देण्याची मी माझ्या आयुष्यातील मोठी राजकीय चूक केली आहे. या चुकीसाठी मला गोव्याच्या नागरिकांची माफी मागायची आहे. आज आमच्या चुकीमुळे गोव्यातील नागरिक त्रास सोसत आहे आणि त्यासाठी प्रायश्चित करण्यास आम्ही तयार आहोत, असे सरदेसाई नागरिकांशी बोलताना म्हणाले.
२०१७ मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक झाली होती. ४० सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्यात परतले. त्यांनी गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यानं राज्यात भाजपाचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. नंतर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र प्रमोद सावंत यांच्याकडे आली होती. सावंत यांच्या सरकारला गोवा फॉरवर्ड पक्षाने पाठिंबा कायम ठेवला होता. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी सरदेसाई यांच्यासह गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तिघांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता.