निवडणूक शपथपत्रातील गुन्हे लपवल्या प्रकरणाची पुनर्विचार याचिका फेटाळली
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 2014 साली निवडणूक शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी नागपूरच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर तक्रारदार ऍड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2019 मध्ये या प्रकरणावर प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. तीच याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील दोन गुन्हे लपवल्याचा आरोप ऍड. सतीश उके यांनी केला होता. मागील वर्षी न्यायालयाने सतीश उके यांच्या याचिकेवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली होती. मागील सुनावणीदरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला होता.
नागपूरच्या न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका आज फेटाळली. दरम्यान, या सगळ्यामागे कोण आहे हे मला देखील माहित आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे लपवल्याचा आरोप ऍड. सतीश उके यांनी केला होता.