चेन्नई – माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांचे आज राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी यांनी ट्विटरवरील पोस्टच्या माध्यमातून शेषन यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
Tamil Nadu: Former Chief Election Commissioner of India, T N Seshan passed away in Chennai, after a cardiac arrest. https://t.co/sfyRzjNFJT
— ANI (@ANI) November 10, 2019
पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना शेषन यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996 या कालावधीत निवडणूक प्रक्रियेमधील अमूलाग्र सुधारणांचे श्रेय त्यांना दिले जाते. आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी शेषन यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे देशातील निवडणूक प्रक्रियेचा चेहरा मोहराच बदलला गेला. निवडणूक प्रचाराच्या काळातील भाषणे, प्रचाराचा खर्च, निवडणूक प्रचाराच्या काळातील जाहीरनामा आणि मतदारांना प्रलोभने न दाखवण्याच्या मुद्दयांचा समावेश आहे.
1990 साली शेषन मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर त्यांनी या आचार संहितेची कठोर अंमलबजावणी करून सर्व राजकीय पक्षांना वठणीवर आणले. त्यामुळेच त्यांचे बऱ्याच राजकीय नेत्यांबरोबर ताणलेले संबंध होते. मात्र कशानेही डगमगून न जाता, शेषन यांनी आपली ठाम भूमिका अखेरपर्यंत कायम ठेवली. या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन 1996 साली त्यांना रामन मेगासेसे पुरस्काराने गौरवण्यात आले होते. निवृत्तीनंतर त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती.