मुंबई – अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या संथ खेळावरून महेंद्रसिंग धोनी याच्यावर टीका केली जात असली तरी ही टीका अयोग्य आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध केलेले अर्धशतक संघासाठी महत्त्वाचे होते. अनुभव हीच त्याच्या यशाची गुरूकिल्ली असून उर्वरित सामन्यांमध्येही यशस्वी होईल असे भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितले.
भारतास 2011 मध्ये धोनी याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळाले होते. 37 वर्षीय खेळाडू धोनी याने विंडीजविरुद्ध सुरुवातीला संथ खेळ केला होता. मात्र, त्याने शेवटच्या षटकात दोन षटकार व एक चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. पण त्याच्या आक्रमक खेळामुळेच भारतास 250 पेक्षा जास्त धावांचा पल्ला गाठता आला होता.
गांगुली यांनी त्याच्या या खेळाचे कौतुक करीत सांगितले की, प्रत्येक वेळी टोलेबाजी करणे अवघड असते. परिस्थितीनुसार खेळ करावा लागतो. धोनी याच्या साथीत कोणता फलंदाज आहे व तो कोणत्या क्रमांकावर खेळावयास आला आहे, त्याप्रमाणे त्याच्या शैलीत फरक होत असतो.