नवी दिल्ली : प्रख्यात वकील, देशाचे माजी अटॉर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 91 वर्षाचे होते. सोली सोराबजी यांची ओळख एक तत्वनिष्ठ आणि मधुर व्यक्तीमत्व अशी होती. त्याच्या निधनावर देशातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
सोली सोराबजी यांचा जन्म १९३० मध्ये मुंबईमध्ये झाला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) १९५३ मध्ये वकीली सुरु केली होती. १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरीष्ठ वकील बनले. ते मानवाधिकारांसाठीचे वकील म्हणून ओळखले जात होते. १९९७ मद्ये युएनने त्यांची नायजेरियामध्ये नियुक्ती केली होती.
1998 ते 2004 पर्यंत ते मानवाधिकार प्रोत्साहन व संरक्षण या विषयावर यूएन-सब कमिशनचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष बनले. त्यांनी हेग येथे 2000 ते 2006 पर्यंत कायमस्वरुपी लवाद लवादाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
मार्च २००२ मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे संरक्षण यामध्ये उल्लेखनीय काम केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.