जुन्नर -गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे काही व्यवसाय सोडले तर अनेक व्यापाऱ्यांचे धंदे पूर्णपणे बंद आहेत. एकीकडे दुकानात विक्रीअभावी पडून राहिलेला माल तर दुसरीकडे गाळ्यांचे सुरू असलेले भाडे व पट्टी अशा दुहेरी संकटामध्ये हे गाळेधारक व्यापारी पुरते अडकले आहेत.
जुन्नर शहरात नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुमारे 500 व्यापारी गाळे आहेत. या गाळेधारकांकडून वार्षिक भाडे व पट्टी आकारली जात असते. या संचारबंदी काळातील गळ्यांचे भाडे प्रशासनाने माफ करावे, अशी मागणी गाळेधारकांकडून होत आहे.
दरम्यान, लातूर येथील ऍड. संजय पांडे यांनी त्यांच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील भाडे माफ केल्याची चित्रफीत व्हायरल झाल्यावर जुन्नर येथे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शहरात पालिका व बाजार समिती यांच्या मालकीव्यतिरिक्त अनेक खासगी संकुले आहेत. त्यांपैकी स्टॅंड किंवा वर्दळीच्या परिसरात असलेल्या गाळ्यांचे भाडे आठ ते पंधरा हजार प्रतिमहिना आहे.
दुकान सुरू नसताना ही भाडी कशी भरायची, हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यासोबतच दुकानात कामावर असलेल्या नोकरांचे पगार द्यायचे का नाही, द्यायचे तर कोठून द्यायचे, हे सुटणारे कोडे व्यापाऱ्यांना पडले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सलून व पानटपऱ्या वगळता इतर दुकाने ठराविक कालावधीत सुरू झाल्याचे चित्र आहे.