राजगुरूनगर – शेतीपंपाची सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, खंडित वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी आज (दि. 2) महावितरणच्या कार्यालयावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद भाजपचे गट नेते शरद बुट्टे पाटील, सदस्य अतुल देशमुख यांनी केले. या मोर्चात भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, संगीता जगताप, ऍड. मालिनी शिंदे, दीप्ती कुलकर्णी, दत्ता सांडभोर, सचिन लांडगे, देविदास बांदल, मोहिनी राक्षे, संगीता मुळुक, पल्लवी नाईक, सुधीर भोमाळे, बाळासाहेब कहाणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शरद बुट्टे पाटील म्हणाले, वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची, नागरिकांची परिस्थिती लक्षात न घेता कृषिपंपाची, पाणी योजनेची व घरगुती वीज कनेक्शन तोडली आहेत. शासनाच्या धोरणानुसार थकीत वीज बिल योजना फसवी आहे. कार्यालयात वीज बिले दुरुस्त केली जात नाहीत. महावितरण कंपनीने तातडीने शेतीपंप वीज जोडणी करावी. आठ दिवसात न्याय मिळाला नाही तर पुढील आंदोलन तीव्र केले जाईल.
अतुल देशमुख म्हणाले, पाणी योजना, शेतकरी कृषी पंप, घरगुती वापराचे मीटर कनेक्शन तोडल्याने शेतकरी तळमळत आहे. महावितरणचा अंदाधुंदी कारभार सुरु आहे. देविदास बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. येथील हुतात्मा स्मृती शिल्पातील हुतात्मा
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाची सुरुवात झाली. वाडा रोडने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे यांनी स्वीकारले.
याबाबत तात्काळ कारवाई केली जाईल. भरमसाठ आलेल्या वीज बिलाबाबत चौकशी करून वेळीच दुरुस्ती केली जाईल. 20 सब स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून सुरु केले जाईल. तालुक्यातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल, अशी वेळ पुन्हा येऊ देणार नाही.
-मनीष ठाकरे, कार्यकारी अभियंता महावितरण