भाजपची मागणी : नागरिकांना दिलेली सरासरी वीजबिले अन्यायकारक
वडगाव मावळ (प्रतिनिधी) –“लॉकडाऊन’ काळात राज्यासह मावळ तालुक्यात महावितरण प्रशासनाकडून आकारले जाणारे सरासरी वीज बिल रद्द करून ग्राहकांना व शेतकऱ्यांना वीज बिल माफ करावे, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
जून महिन्यामध्ये राज्यासह मावळ तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना ज्या पद्धतीने वाढीव बिलाची आकारणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महावितरणकडून आकारले जाणारे सरासरी वीजबिल अन्यायकारक असल्याने रद्द करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते तहसीलदार मधुसूदन बर्गे व विद्युत अधिकारी विजय जाधव यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या वेळी केंद्र सरकार पॅकेज देत असेल, तर राज्य सरकारने एक पैसा जनतेला दिला नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने हे वीज बिल माफ करावे, असे माजी राज्यमंत्री संजय भेगडे म्हणाले. मागील एक महिन्यापासून तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत. तेथील वीज पुरवठा त्वरीत सुरू करावा अन्यथा आंदोलन करून विद्युत कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी दिला. यावेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे व तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे, महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे, सरचिटणीस सुनील चव्हाण, अनंता कुडे, संघटक सरचिटणीस कल्याणी ठाकर, सरचिटणीस अनिता सावले उपाध्यक्ष रोहिणी गाडे, नाणे मावळ अध्यक्ष सीमा आहेर, बाबूलाल गराडे, नामदेव वारिंगे, नगरसेवक दिनेश ढोरे उपस्थित होते.