चांदणी चौक मुळशीमार्गे कोकण रस्त्यांचे काम अर्धवट बंद
– सागर येवले
बावधन – चांदणी चौकातून मुळशीमार्गे कोकणात जाणाऱ्या महामार्गाचा मुख्य दरवाजा असलेल्या भुकुम येथील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) या कामाचा विसर पडला आहे. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता आहे की, अपघातासाठी? असा प्रश्न हे काम पाहून उपस्थित होऊ लागला आहे.
चांदणी चौकातून मुळशीमार्गे कोकणात जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. ताम्हिणी घाट, मुळशी येथील रस्त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. मात्र, कोकणात उतरण्यासाठी ज्या गावातून जावे लागते अशा बावधन, भूगाव आणि भुकूम परिसरातील रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. अनेक, ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पुणे जिल्ह्याची वेस असलेल्या भूगाव ते बावधन येथील मारीगोल्ड कार्यालयापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अपूर्ण आहे. हा रस्ता म्हणजे कोकणात जाणारा मुख्य दरवाजा मानला जातो. मात्र, एका बाजूचे काम पूर्ण तर दुसऱ्या बाजूचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. याठिकाणी रस्त्यावर दिवे नसल्याने तसेच रस्त्याची उंची वर-खाली असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नाही.
रस्त्यावरून वाहने खाली येऊन अपघात घडत आहे. हीच परिस्थिती भुकुम येथील मानस तलाव परिसरात चढ आणि वळणाचा रस्ता असलेल्या ठिकाणी आहे. काही महिन्यांपूर्वी या अपघातामध्ये काहींना जीव गमवावा लागला. तर, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक नाहीच…
बावधन, भूगाव, भुकुम यासह पौंडपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. एका बाजूचे काम पूर्ण तर दुसऱ्या बाजूचे काम अपूर्ण असल्यामुळे रस्त्याची उंची खाली-वर झाली आहे. त्याठिकाणी कोणतेही संरक्षक कठडे किंवा दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे येथे अपघात होत आहेत. याबाबत महामार्ग विभागाचे अधिकारी निफाड यांच्याशी चर्चा केली असता, दिवाळीनंतर ही सर्व कामे मार्गी लागतील. दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना तत्काळ देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, एक महिना झाला तरी अद्याप कोणतीही उपाययोजना झाली नसल्याचे दिसून येते.