पुणे – वनक्षेत्रात वणवा व्यवस्थापनासाठी वनविभागाकडून लोकसहभाग वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी लोकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरत असून, अशी घटना निदर्शनास आल्यास तत्काळ 1926 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
उन्हाळा ऋतु सुरू होताच, वणवा लागण्याच्या घटना सातत्याने घडतात. मानवनिर्मित, नैसर्गिक अशा कारणांमुळे आग लागून त्याचे रुपांतर वणव्यात होते. वेळीच ही आग आटोक्यात आणली नाही तर त्यातून वनसंपत्ती-वन्यजीवांना मोठा धोका उद्भवतो. पुण्यातही दरवर्षी टेकड्यांवर तसेच अन्य ठिकाणी वनक्षेत्रात आग लागल्याच्या घटना घडतात.
हा प्रकार टाळण्यासाठी तसेच वणवा व्यवस्थापनासाठी संयुक्त मोहीम हाती घेण्याचा विभागाचा मानस असल्याची माहिती पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. याप्रसंगी विभागाचे सहायक उपवनसंरक्षक मयुर बोठे आणि अशुतोष शेंडगे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “शेकडो हेक्टरवर पसरलेल्या वनक्षेत्राची सातत्याने निगराणी करणे हे आव्हानात्मक काम आहे. अशावेळी केवळ वनसुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने हे काम होणे कठीण होते. त्यातून वणव्यासारख्या घटनेत तातडीने प्रतिसाद देणे गरजेचे असते. अशावेळी नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास हे काम अधिक जलद होऊन संभाव्य धोके टाळता येतील. यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत.’
वनविभागाकडून आंतरविभागीय समन्वयासाठी प्रयत्न
शहरात अनेकदा वणव्यासंदर्भात कारवाई करताना हद्दीचा प्रश्न उद्भवतो. अनेक ठिकाणी वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि खासगी मालकीचे क्षेत्र असा संयुक्त प्रदेश असतो. अशावेळी कारवाई नेमकी करायची कोणी? हा प्रश्न उद्भवतो. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी विभागातर्फे आंतरविभागीय समन्वय वाढविण्याबाबत प्रयत्न केले जाणार असून, त्यासाठी लवकरच स्वतंत्र परिषद आयोजित करणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.