टोकियो -करोनाच्या धोक्यातही ऑलिम्पिक स्पर्धा घेत असलेल्या जपानने आपल्या नागरिकांची काळजी घेता यावी यासाठी या स्पर्धेसाठी परदेशी प्रेक्षकांना मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर नवे वेळापत्रक जाहीर केले गेले.आता यंदा ही स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत पॅरिलिम्पिकही होणार आहे.
परदेशी पाहुण्याचे स्वागत करायला नक्कीच पुढाकार घेतला असता. स्पर्धेच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळाली असती. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे आम्हाला नागरिकांसह खेळौडूंचीही काळजी आहे. त्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. अनेक देशात अजूनही कोरनाचे रुग्ण आढळत आहेत, असे जपान सरकारने म्हटले आहे.
स्पर्धेतील केवळ सामनेच नाही, तर उदघाटन सोहळा व ज्योत रिले हे कार्यक्रमही प्रेक्षकांविनाच होणार आहेत. उदघाटन सोहळा देखील बंद दरवाजा आडच होणार आहे. सोहळ्यासाठी केवळ खेळाडू व निवडक निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाविषयी अद्याप ऑलिम्पिक समितीने काही मत व्यक्त केलेले नाही.
या संदर्भातील निर्णय ज्योत रिले सुरू होण्यापूर्वी घेतला जाईल, ज्योत रिले 25 मार्च रोजी सुरू होणार आहे. आम्हाला ऑलिंपिकसाठी जगभरातील प्रेक्षक हवे आहेत. पण, जोपर्यंत जपानमधील करोनाबातची परिस्थिती अनुकुल होत नाही, तोपर्यंत परदेशातून येणाऱ्या प्रेक्षकांनाही खूप त्रास होईल याचाही विचार व्हायला हवा, असे मत समितीच्या अध्यक्षा सेईको हाशिमोटो यांनी व्यक्त
केले आहे.
नागरिकांचा विरोध कायम
जपानमधील नागरिक या स्पर्धेच्या विरोधात आहेत. एका सर्वेक्षणानुसार 77 टक्के जनतेने ही स्पर्धाच रद्द करा अस्े सांगताना जर स्पर्धा हट्टाने घेण्यात आली तर परदेशी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ नये तसेच देशातही पुढील काही काळ पर्यटनावर बंदी लावण्यात यावी अशी मागणीही देशवासियांनी केली आहे.