संयुक्तराष्ट्रे – भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी आज संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अफगाणिस्तानातील स्थिती, म्यानमार, जागतिक तापमान बदल, सुरक्षा परिषदेची सुधारणा, कोविड स्थिती इत्यादी विषयावर चर्चा झाली.
श्रृंगला यांनी या विषयांवर भारताची भूमिका संयुक्तराष्ट्रांकडे स्पष्ट केली. श्रृंगला हे 14 तारखेपासून न्युयॉर्कच्या दौऱ्यावर आले आहेत. भारताला संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट आयोजित करण्यात आली होती.
गुटेर्रेस यांची संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. या बद्दल श्रृंगला यांनी त्यांचे अभिनंदनही केले. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भुषवताना भारताचा अग्रक्रम काय असेल या विषयीही त्यांनी गुटेर्रेस यांना माहिती दिली. भारतात कोविड लाटेत अलिकडेच मोठे नुकसान झाले असून या लाटेत मनुष्य हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या बद्दल संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनी भारताबद्दल सहानुभुती व्यक्त केली.
तसेच सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारतावर येत असल्याने या कामी त्यांनी भारताला शुभेच्छाही दिल्या. सुरक्षा दलाच्या सुरक्षा विषयक उच्चस्तरीय ब्रिफिंगलाही श्रृंगला यांनी हजेरी लावली. फ्रांसच्या विदेश मंत्र्यांशीही श्रृंगला यांनी या दौऱ्यात स्वतंत्र चर्चा केली.