नवी दिल्ली – विदेशी गुंतवणूकदारांनी व्यवहाराच्या केवळ चार सत्रात देशातील शेअर बाजारात तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याने देशातील शेअर बाजारातील विश्वासाचे वातावरण पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे.
भारतातील कोविडचे कमी होत जाणारे प्रमाण आणि कंपन्यांच्या उत्पन्नांमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे बाजारातील गुंतवणुकीची भावना वाढीला लागली असल्याचेच संकेत मिळत आहेत असे या क्षेत्रातील काही जाणकारांनी म्हटले आहे.
या गुंतवणुकीच्या संबंधातील जो डाटा उपलब्ध आहे त्यानुसार 1 जून ते 4 जून या अवधीत फॉरिन पोर्टफोलिओ इनव्हेस्टर्सनी 7 हजार 968 कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी मार्केटमध्ये केली आहे. अजूनही देशातील बऱ्याच भागात करोनाचा लॉकडाऊन सुरू आहे.
तथापि ज्या ठिकाणी हे प्रमाण कमी झाले आहे तेथील अनलॉकिंगचीही प्रक्रिया सुरू झाल्याने वातावरणात जरा मोकळेपणा येऊ लागला आहे. ज्या प्रमाणात करोनाचे प्रमाण कमी होईल त्या प्रमाणात देशातील विदेशी गुंतवणुकीत वाढ होईल अशी माहिती या क्षेत्रातील एक तज्ज्ञ हरिष जैन यांनी सांगितली.अनेक कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील निकालांनीही विदेशी गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत असेही एका तज्ज्ञाने सांगितले.