मुंबई – नोव्हेंबर महिन्यात पहिल्या पंधरा दिवसातच परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारामध्ये तब्बल 35,109 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
भारत सरकारने जाहीर केलेले पॅकेज आणि भारतीय कंपन्यांनी सादर केलेले चमकदार ताळेबंद यामुळे भारतातील गुंतवणूक अधिक परतावा देऊ शकेल असे परदेशी गुंतवणूकदारांना वाटत आहे.
पॉझिटरीनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 29,436 कोटी रुपयाची तर कर्जरोखे बाजारात 5,673 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये या गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 22,033 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दुसऱ्या तिमाहीत भारतीय कंपन्यांनी चांगला नफा कमविला आहे. त्यात वाढ होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. भारतातील शेती क्षेत्रावर कसलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळे शेती संबंधातील कंपन्या, औषधी कंपन्या, माहिती तंत्रज्ञान आणि काही बॅंका या गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत आहेत.