बडे थकबाकीदार अद्यापही कारवाईपासून दूरच
नगर – महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे सेवानिवृत्त झाल्याने मनपाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे शासनाने दिला. पदभारहाती येताच द्विवेदी यांनी पालिकेचा मालमत्ता कर व पाणी पट्टी थकबाकी वसूलीची मोहीम हाती घेत संबंधित अधिकाऱ्यांना वसूलीचे उद्दीष्ट्ये दिले. मात्र, या अधिकाऱ्यांकडून छोट्या-छोट्या कारवाया करत डांगोरा पिटविला जात असून, बडे थकबाकीदार अद्यापही कारवाई पासून दुर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मनपाच्या वसुली विभागाकडून कारवाईचा फार्स दाखविला जात असल्याचे बोलले जात आहे.
प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी थकीत मालकत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रीत केले. मालमत्ताकराची सुमारे 282 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मालमत्ताकराची थकीत वसुली का होत नाही, असा सवाल करत बड्या थकबाकीदारांची नावे फ्लेक्स बोर्डवर झळकाविण्याचे आदेश दिले. तसेच वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात जप्तीची कारवाई करावी असे ही सांगण्यात आले.
त्यानंतर प्रभाग समिती क्र. चार ने कृषी उत्पन्ना बाजार समितीचा गाळा, ज्ञानसागर कोचिन क्लासेच चे चार गाळे सील केले. मात्र, वसुली विभागाकडून बड्या थकबाकीदारांना छेद देण्यात येत असून छोट्या- छोट्या व्यावसायींकांवर कारवाई होत आहे. त्यामुळे कारवाईत कुठलाही भेदभाव न करता मोठ्या थकबाकीवर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
महापालिकेचे चार प्रभाग कार्यालये असून, या चारही प्रभाग अधिकाऱ्यांना सरासरी दहा कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. मार्च अखेरपर्यंत 50 कोटींपर्यंत वसुली करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, वसूली विभागाकडून सेटलमेंट न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे बडे थकबाकीदार यांचा आकडा वाढत जाणार असून मनपा मार्च अखेर उद्दिष्ट्ये पूर्ण करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांनी ही स्वत: लक्ष घालून बड्या थकबाकीदारांवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली नाही म्हणजे बरे..
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे ही मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांनी परिपत्रक काढून थकबाकी वसूलकरण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करून भरणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता कराचा भरणा एकरकमी भरणा शक्य नसल्यास मासिक वेतनातून हप्ता पाडून वसूल केला जाणार असल्याचे पत्रक काढले आहे. असेच पत्र गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वीही काढण्यात आले होते. व कर्मचाऱ्यांच्या पगारातून थकबाकी वसूल करण्यात आली. मात्र, ना थकबाकी कमी झाली ना पगारातून कपात केल्याले पैसे कर्मचाऱ्यांना मिळाले. त्याची पुनरावृत्ती झाली नाही म्हणजे बरे..