मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सर्वात आधी नाशिकमध्ये शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बडगुजर यांनी राणेंच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली आहे.
नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकबरोबरच पुणे आणि महाडमध्येही राणेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणामध्ये राणेंविरोधात सर्वात प्रथम तक्रार दाखल करणाऱ्या बडगुजर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना राणेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे असंसदीय पद्धतीचे असल्याचे बडगुजर म्हणाले आहेत. तसेच राणेंनी खाल्ल्या मिठाला जागणं गरजेचं आहे, असा टोलाही त्यांनी लागवला आहे. सध्या पोलिसांचं एक पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाल्याने पोलीस करत असलेल्या कारवाईवर आपण समाधानी असल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर शिवसैनिक चळवळ उभी करतील असंही बडगुजर म्हणाले आहेत. तसेच कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली असून भविष्यात या प्रकरणात कशाप्रकारे कारवाई होते हे पाहून शिवसैनिक रस्त्यावर उतरणार की नाही हे ठरेल असे संकेतही बडगुजर यांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणे अर्वाच्च्य भाषा वापरुन शिवसैनिकांना चिथावणी देत आहेत, असा आरोपही बडगुजर यांनी केली आहे. राणे अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंकडून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा मागितला पाहिजे, असेही बडगुजर म्हणाले आहेत. राणेंना केंद्रीय मंत्रिपदाच्या रुपाने चांगले काम करुन राजकीय भविष्य सुधारण्याची संधी मिळालेली. मात्र राणेंनी ती संधी वाया घालवल्याचे दिसत आहे.
केंद्रीय मंत्र्याला शपथ देताना कोणत्याही राज्याविषयी, नेत्याविषयी आकस बाळगणार नाही, अशी शपथ दिली जाते. राणेंनी याचे उल्लंघन केले आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावा, अशी मागणी बडगुजर यांनी केली आहे.