लाहोर – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी हाफिज सईद याच्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांनी आज पंजाब प्रांतात छापासत्र केले. एकाचवेळी अनेक शहरांमध्ये हे छापे घालण्यात आले आणि अनेकांना ताब्यात घेण्यात आले.
हाफिज सईदच्या घराबाहेर पोलिसांनी उभ्या केलेल्या कुंपणाजवळ झालेल्या कार बॉम्बच्या स्फोटात किमान तिघेजण ठार झाले होते आणि 21 जण जखमी झाले होते. सईदच्या घराजवळ बंदोबस्तासाठी असलेले काही पोलीसही या बॉम्बस्फोटात जखमी झाले होते. बॉम्बस्फोटामुळे सईदच्या घराच्या खिडक्यांची तावदाने पुटली होती आणि भिंतींचेही नुकसान झाले आहे.
यातच या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ताशकीर-ए-जबल नावाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एक मोहिम हाती घेण्यात आली होती. डोंगराळ भागांमधील युद्ध अभ्यासाच्या नावाखाली ही राबवण्यात आलेल्या या मोहिमेच्या आधी झालेल्या एका वादामधून हाफिजच्या घराबाहेर स्फोट घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. लष्करासोबत झालेल्या वादानंतर हाफिजला धडा शिकवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने हा स्फोट घडवून आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या स्फोटाच्या तपासासाठी पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने अर्थात “सीटीडी’ने आज संपूर्ण पंजाब प्रांतात अनेक शहरांमध्ये छापे घातले. “सीटीडी’ आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून काही पुरावेही ताब्यात घेतले आहेत. स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात आलेले बॉल बेअरिंग, लोखंडाचे तुकडे आणि स्फोट झालेल्या कारचे काही भाग तपासासाठी जमा करण्यात आले आहेत. घटनास्थळाला कुंपण घालून चहूबाजूंनी बंद करण्यात आले आहे. या क्षेत्राला “जीपीएस’ आणि “रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन’ यंत्रणेने संरक्षित करण्यात आले आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी या बॉम्बस्फोटाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या अफगाणिस्तानबाबतच्या चुकीच्या धोरणामुळे देशात अशाप्रकारचे आणखीन हल्ले वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. काही दहशतवादी संघटना सीमेपलीकडे सक्रिय असल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तान सरकार अफगाणिस्तानमध्ये मागच्या दाराने जी चर्चा करत आहे, त्याचा तपशील लोकांपुढे यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.
हाफिज सईदला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर तब्बल 1 कोटी डॉलरचे बक्षिस लावण्यात आले आहे. सईदला पाकिस्तानमध्ये दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले असून त्याला 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सईदच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या लष्कर ए तोयबाने 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. त्यात 166 जण मारले गेले होते.